अहिल्यानगर (प्रतिनिधी):
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन सुनावणीदरम्यान बूट फेकून हल्ला केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी वकिलावर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन हा निषेध नोंदवला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, दीपक पाचारणे, मानिक नवसुपे, ज्ञानेश्वर म्हेसमाळे, अतुल देव्हारे, आप्पासाहेब केदारे आणि संतोष उदमले आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालय हे देशाच्या न्याय, समता आणि संविधानाचे सर्वोच्च मंदिर आहे. अशा ठिकाणी देशाचे सरन्यायाधीश आणि अनुसूचित जातीतील व्यक्ती असलेल्या भूषण गवई यांच्यावर हल्ला होणे ही अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर बाब आहे.
शिवाजीराव साळवे यांनी सांगितले की, “ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही, तर भारताच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर थेट आघात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई हे त्यांच्या कार्यकुशलतेने आणि प्रामाणिकतेने सर्वोच्च न्यायालयात मानाचे स्थान प्राप्त केलेले आहेत. त्यांच्यावर असा अपमानजनक प्रकार घडणे म्हणजे संपूर्ण मागासवर्गीय समाजाचा अपमान आहे.”
साळवे पुढे म्हणाले की, “आजही समाजात जातीयवादी विचारसरणी जिवंत असल्याचे या घटनेतून स्पष्ट दिसते. सर्वोच्च न्यायालयातील अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिकांची सुरक्षितता कशी राहील, हा गंभीर प्रश्न आहे.”
महासंघाने दिलेल्या निवेदनात केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने व गंभीर दखल घेऊन आरोपी वकिलावर कठोर कारवाई करावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.