नेवासा | १८ जून २०२६
वंजारवाडी (ता. नेवासा) येथे वर्षश्राद्धानिमित्त पूर्वजांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी वृक्षलागवडीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कै. बाबासाहेब त्रिंबक डोळे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त तसेच कै. फकिरा बाप्पू डोळे, कै. त्रिंबक फकिरा डोळे, कै. दगडाबाई फकिरा डोळे व कै. अंबादास त्रिंबक डोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार दि. १७ जून रोजी सकाळी १० वाजता वृक्षलागवड व वृक्षवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पूर्वजांना आदरांजली वाहतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने या उपक्रमात १०१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर, पाहुणे आणि ग्रामस्थांना वृक्षांचे वाटप करण्यात आले.
वृक्षसंवर्धनाची प्रेरणा देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय मा. खा. श्री. यशवंतरावजी गडाख साहेब आणि माननीय श्री. तुकाराम मुंढे साहेब यांच्या विचारातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमास माजी मंत्री शंकरराव गडाख, उदयन गडाख, आ. विठ्ठलराव लंघे, दिलीप नागरे, गुलाबराव सांगळे, पत्रकार विनायक तात्या दरंदले, राजु बोरुडे, संतोष तेलोरे, प्राध्यापक डॉ. संभाजी दराडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प. भगवान महाराज मचे यांनी वृक्षलागवड ही काळाची गरज असून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षसंवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन केले.

पूर्वजांच्या स्मृती जपत समाजासाठी आणि निसर्गासाठी योगदान देणारा हा उपक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. उपस्थितांनी डोळे परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com